<p>कोल्हापूर- जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे पंचगंगा नदीचं उगमस्थान असलेल्या प्रयाग चिखलीचा परिसर जलमय झाला आहे. प्रयाग संगमाच्या ठिकाणी कुंभी कासारी तुळशी धामणी आणि भोगावती या नद्यांचा संगम होत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालं आहे. आसपासची शेतीदेखील पाण्यामध्ये गेली आहे. या संगमाच्या परिसरात असलेली काही मंदिरदेखील आता पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा आणि वारणा धरणातून होत असलेला विसर्ग आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत आहे. आज दुपारी बारा वाजता पंचगंगा नदी राजाराम बंधारा इथं 40 फुटांवरून वाहत असून नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर येत्या 24 तासात पंचगंगा नदी धोका पातळी गाठू शकते. यामुळे कोल्हापूर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने पूरबाधित नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आल्या आहेत.</p>