<p>पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी गुरूवारी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केलं. "राज्यात सरकारनं ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ यांच्या निकषात फरक आहे. आज मराठवाड्यातील लोक गाव सोडत आहे. अनेक गावात मोठं नुकसान झालं आहे. अस असताना फक्त सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहता येणार नाही. तर त्यासाठी लोक चळवळ उभी केली पाहिजे. सरकारनं तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. सरकारनं कोणताही विचार करू नये. शेतकरी आज संकटात असून त्यांना मदतीची गरज आहे," असं डॉ. बाबा आढाव म्हणाले. </p>
