<p>बीड- जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी अंकिता कवचट या विद्यार्थिनीने शाळेतील मूलभूत सुविधांचा अभाव आणि कथित भ्रष्टाचाराबाबत थेट पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिल्याने एकच खळबळ उडालीय. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, प्रशासनासमोर गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. आपल्या शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, वर्गखोल्यांची दुरवस्था, बसण्यासाठीची सोय, शैक्षणिक साहित्य अशा मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे नमूद आहे. कागदावर खेळाचे साहित्य, पाणी फिल्टर, प्रोजेक्टर इतर साहित्य दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात ते शाळेत उपलब्ध नसल्याचे तिचे म्हणणे आहे. यासंदर्भात महिला सरपंचाने आरोप फेटाळून लावत मुलीने उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले हा आमचा विकास आहे ही आमची प्रगती आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तर याची चौकशी करावी त्याला आम्ही सामोरं जायला तयार आहोत, असं महिला सरपंचांनी म्हटलंय.<br> </p>
