<p>बारामती - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. राज्याच्या विविध भागांतून आलेल्या या मुलांनी सर्वप्रथम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले, त्या स्थळाचे दर्शन घेताना अनेकांच्या भावना अनावर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.</p><p>यानंतर ही सर्व मुलं बारामतीतील ‘सहयोग’ निवासस्थानी दाखल झाली. येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांची या मुलांनी सांत्वनपर भेट घेतली. शेतकरी कुटुंबांवर आलेल्या दुःखात सहभागी होत, त्यांच्या वेदना समजून घेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.</p><p>सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक मुलाशी संवाद साधत त्यांच्या शिक्षण, भविष्यातील वाटचाल आणि अडचणींबाबत माहिती घेतली. “या मुलांच्या पाठीशी शासन आणि समाज ठामपणे उभा राहील,” असे आश्वासन त्यांनी दिले.</p>
