<p>नांदेड - जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी सहभाग नोंदवला असून, तब्बल १९९ जागांसाठी १४ हजार ६०० स्पर्धक मैदानात उतरले आहेत. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस विभागाकडून अत्यंत कडक खबरदारी घेण्यात येत आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.</p><p>सकाळी लवकरच पोलीस भरतीसाठी आलेल्या स्पर्धकांना मैदानात प्रवेश दिला जात आहे. त्यानंतर कागदपत्रांची तपासणी करून प्रत्येकाला बॅच व क्रमांक देण्यात येतो. पुढे मैदानी चाचण्यांना सुरुवात होते. १०० मीटर धावणे, १६०० मीटर रनिंग, गोळा फेक, उंची व छाती मोजणी अशा विविध चाचण्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जात आहेत.</p><p>प्रत्येक मैदानी चाचणीनंतर लगेचच उमेदवाराने किती वेळात चाचणी पूर्ण केली, याची नोंद थेट फॉर्मवर केली जाते आणि त्यावर स्पर्धकाची स्वाक्षरी घेतली जाते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तफावत किंवा शंका निर्माण होण्याची शक्यता राहत नाही. संध्याकाळपर्यंत त्या दिवसाची अंतिम यादी पोलीस विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रसिद्ध केली जाते.</p>
