<p>पुणे - गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत असून वातावरणातील गारवा कमी होऊन तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. या वातावरणीय बदलानं गेल्या 24 तासात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. तर पुढील दोन दिवस देखील राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एस. डी. सानप म्हणाले की, गेल्या 24 तासाचा विचार केला तर दक्षिण मध्य विभागातील सांगोला, लातूर, धाराशिव तसंच विदर्भातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह पाऊस पडला आहे. तर काही ठिकाणी गारा देखील पडल्या आहेत. येत्या चार ते पाच दिवसांचा विचार केला तर येणाऱ्या दोन दिवसात दक्षिण मध्य महाराष्ट्र तसंच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात देखील अशी स्थिती असणार असल्याची शक्यता आहे असं यावेळी सानप म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हिवाळ्यातून उन्हाळ्यात जात असताना अशी परिस्थिती ही अनेकवेळा निर्माण होत असते. तसंच गेल्या काही काही दिवसांपासून वातावरणात तापमान वाढलेलं असून यामुळे आद्रता देखील वाढली आहे. वातावरणात जे काही बदल होत आहेत, त्या बदलामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी हवामान विभागाकडून जी माहिती देण्यात येत आहे त्याचं पालन करावं असं आवाहन देखील यावेळी त्यांनी केलं.</p>
