<p>पुणे : गेल्या तीन दिवसांपासून इराण अमेरिका इस्राएल या देशांसह आखाती देशांमध्ये युद्ध सुरू असून, याचा मोठा फटका भारताला बसला आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय निर्यात वाहतूक विस्कळीत झाल्याने त्याचा थेट फटका भारतातील शेतकरी आणि निर्यातदारांना बसलाय. भारतातून निर्यात होणारी फळं आणि पालेभाज्या गेल्या दोन दिवसांपासून जागेवरच थांबून आहेत. विमान सेवा बंद असल्याने माल पाठवता येत नाही, तर सागरी मार्गावरही अनिश्चितता निर्माण झाल्याने हजारो टन निर्यात बंदरावर पडून आहे. आंतरराष्ट्रीय तणावामुळे हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणावर ठप्प झालीय. ताज्या फळे आणि भाजीपाल्याची निर्यात सध्या अशक्य झालीय, त्यात समुद्री मार्ग ही बंद ठेवण्यात आला संघर्ष वाढल्यास जहाज वाहतुकीवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. विशेषतः वेळेवर पोहोचणे आवश्यक असलेल्या नाशवंत मालासाठी हा मोठा धोका मानला जातोय, ज्यामुळे कोट्यावधींचे नुकसान होणार आहे. केंद्र सरकारने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी निर्यातदार यांनी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे रमजान महिना सुरू असल्याने भारतातून मोठ्या प्रमाणावर या देशांमध्ये फळे निर्यात होतात. भारतातून मात्र आता ऑर्डर घेऊन व्यापारी आता अडचणीत आलेत. अचानक बंद केल्याने मोठा आर्थिक फटका निर्यातदार यांना बसला असून, याबाबत निर्यातदार समीर पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी बातचीत केलीय. <br><br> </p>
