<p>रायगड - जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वहूर गावातील उगवती वाडीवरील महिला मंडळाने लग्नसमारंभातील वाढत्या खर्चाला आळा घालण्यासाठी अत्यंत धाडसी आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. लग्न कार्यात प्रचलित असलेल्या खर्चिक प्रथांना पूर्णविराम देत बस्ता बांधणे, उटणे आणि हळदीच्या कार्यक्रमात मटण व दारू देण्यावर गावपातळीवर बंदी घालण्याचा निर्णय महिलांनी घेतला आहे. लग्नसमारंभात बस्ता म्हणजे कापड आहेर देण्याची प्रथा मोठ्या प्रमाणात रूढ झाली असून, या प्रथेमुळे यजमान कुटुंबावर मोठा आर्थिक ताण येतो. पाहुणे आणि नातेवाईकांना साड्या, कपडे देण्यावर हजारो रुपयांचा खर्च होतो. त्याचबरोबर उटणे आणि हळदीच्या कार्यक्रमात मटण-दारूची मेजवानी देण्याची प्रथा वाढल्याने खर्चाबरोबरच अनेकदा वाद आणि गैरप्रकारही घडत असल्याचे महिलांनी निदर्शनास आणून दिले. वाढती महागाई आणि सामाजिक समारंभातील अनावश्यक दिखाऊपणाला आळा घालण्यासाठी वहूर गावातील महिलांनी एकत्र येत हा निर्णय घेतला. </p><p>विशेष म्हणजे, या निर्णयाचे पालन न करणाऱ्या लग्न समारंभात महिला मंडळ कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, असा कठोर निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे. शिमग्याच्या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामस्थ आणि चाकरमानी यांच्या उपस्थितीत महिलांची बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला असून ग्रामस्थांनीही महिलांच्या या पुढाकाराचे स्वागत करत पाठिंबा दर्शवला आहे. </p>
