<p>नांदेड : जिल्ह्यातील कौलगुडा या गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान महाप्रसादातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे दीडशेहून अधिक भाविकांना त्रास झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांना अचानक उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते कैलास गोरठेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना मदत केली. त्यांनी स्वतः पुढाकार घेत सर्व रुग्णांना उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, रुग्णांची संख्या मोठी असल्यानं आरोग्य केंद्रात जागा अपुरी पडू लागली. त्यामुळं काही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. आरोग्य केंद्राचे अधिकारी तसंच जिल्हा शल्यचिकित्सक यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.</p>
