<p>नंदुरबार : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळं नंदुरबार तालुक्यात शेकडो हेक्टर पिकांचं नुकसान झालय. विशेषतः केळी आणि पपई काढणीवर आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तर कापूस सोयाबीन आणि मकासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालय. तहसील कार्यालयाकडून सदर नुकसानीचं पंचनामे सुरू आहेत. मात्र कृषी अधिकारी आणि मंडळ अधिकारी यांना शेतकऱ्यांकडून संपर्क केला असला त्यांच्याकडून शेतकऱ्यांना योग्य तो प्रतिसाद न दिल्या गेल्यामुळं मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जातेय.</p><p>शेकडो हेक्टर पिकांची नुकसान : नंदुरबार तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर केळी, पपई, कापूस, मिरची, सोयाबीन आणि मका या पिकांच्या नुकसान मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ऐन काढणीवर आलेल्या केळी, पपई पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. तर त्यासोबतच कापूस, मिरची, सोयाबीन आणि मका पिकांचं देखील झाला आहे. आधीच मिरचीला भाव नसल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडं वरूण राजानं पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. त्यामुळं या संकटातून बळीराजाचा कसा बाहेर पडणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय.</p><p>65 मिलिमीटर पावसाची नोंद : हवामान खात्याकडून नंदुरबार जिल्ह्यात ग्रीन अलर्ट जारी केला होता. त्यानुसार नंदुरबार तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. सुमारे 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली आहे.</p><p>शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांवर केली नाराजी व्यक्त : शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी तथा तलाठी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट तहसीलदारांशी संपर्क साधला. तहसीलदार प्रदीप पवार यांनी तत्काळ शेतकऱ्यांची बांधावर जाऊन भेट घेत नुकसानाची पाहणी केली. तर संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचं तहसीलदार पवार यांनी सांगितलं.</p><p>वीज पडून पशुधन दगावले : शनिवारी नंदुरबार तालुक्यात झालेल्या वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटात झालेल्या पावसात न्याहली गावात वीजपडून पशुधन दगावली आहेत. याबाबत तहसीलदार पवार पाहणी करून त्वरित पंचनामे करत आहेत.<br> </p><p>Conclusion:</p>
