<p>नाशिक - राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी, लोकाभिमुख व शाश्वत करण्याच्या उद्देशाने आयोजित ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026’ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर येथे पार पडला. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर येथे जलदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल, टाळ, मृदूंगाच्या गजरात आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवीत उत्साहाने जलजागृतीचा संदेश देण्यात आला. "नदीजोड प्रकल्प हातात घेऊन महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला असून, भविष्यात महाराष्ट्रात दुष्काळ दिसणार नाही," असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.</p><p>गोदावरी नदीचं उगमस्थान असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सपत्नीक जलपूजन करून शहरातून जलदिंडी काढण्यात आली. याप्रसंगी जुना आखाड्याचे महंत हरिसिंग महाराज तसेच आनंद आखाड्याचे अध्यक्ष भगवान बाबा उपस्थित होते. त्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जलयात्रेची पालखी टाळ-मृदुंग व ढोल-ताशांच्या गजरात शहरातून मार्गस्थ झाली. </p>
