<p>मुंबई - कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मुंबईमध्ये प्रमुख विरोधी पक्षातर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर, दीपक पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना (ठाकरे) माजी खासदार विनायक राऊत, यांच्यासह अन्य विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. या मोर्चाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसंच शरद पवार यांनी देखील पाठिंबा दर्शवला आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजता गिरगाव चौपाटी येथून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगला येथे जाणार आहे. या मोर्चाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद द्यावा असं आवाहन आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलं. यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा उत्पादकांना हेक्टरी 5 लाख तर काजू उत्पादकांना हेक्टरी 3 लाख रुपये मदत मिळावी अशी मागणी करत असल्याचं यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.</p>
