<p>मुंबई : गेल्या दहा वर्षांत रेल्वेनं मोठ्या प्रमाणावर यशस्वी कामगिरी केली आहे. पश्चिम रेल्वेनं आज मंगळवार (19 मे) सकाळपासून बांद्रा (पूर्व) येथील गरीबनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतून आणखी 50 मेल गाड्या धावल्या पाहिजेत, असं लक्ष्य पश्चिम रेल्वेला दिलं आहे. त्या अनुषंगानं करण्यात आलेली ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. यासोबतच भविष्यातही रेल्वेतर्फे अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येणार आहेत. या जागेवर भविष्यात मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रकल्प उभारले जाऊ शकतात. नवीन प्लॅटफॉर्म, रेल्वेच्या नव्या लाईन्स तसेच मेंटेनन्स फॅसिलिटीदेखील येथे विकसित करता येणार आहे. त्यामुळं रेल्वेच्या या जागेवर भविष्यात मोठ्या प्रमाणावर रेल्वेसंबंधित विकास प्रकल्पांना प्राधान्य दिलं जाणार आहे. याबाबत बोलताना पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक म्हणाले, “देशाच्या विकासाच्या दृष्टीनं तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रगतीसाठी हे अनधिकृत बांधकाम हटवणं अत्यंत आवश्यक होतं. आम्ही केवळ न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आहोत. या कारवाईमुळं ‘विकसित भारत’ संकल्पना साकार करण्यास मदत होणार आहे.”</p>
