<p>रायगड : गेली 17 वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथे टोल (Kharpada Toll) वसुली सुरू करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील पत्रकार संघटना, मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लबच्यावतीनं आज खारपाडा टोल नाक्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. टोल वसुलीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पत्रकारांनी काही काळ कोकणाकडं जाणाऱ्या मार्गावरील टोल वसुली बंद पाडली. “महामार्ग पूर्ण करा, मगच टोल सुरू करा” आणि “अपूर्ण रस्त्यावर टोल का?” अशा घोषणा देत पत्रकारांनी शासनाचा निषेध केला. रायगड प्रेस क्लबचे संस्थापक तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी यावेळी शासनावर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे गेल्या अनेक वर्षांत अडीच हजारांहून अधिक प्रवासी आणि पर्यटकांना अपघातात जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांनी केला. या दुर्घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारत शासनाने पुढील किमान दहा वर्षे मुंबई-गोवा महामार्गावरील टोल माफ करावा, अशी मागणीही त्यांनी केली. </p>
