<p>नांदेड : शक्तीपीठ महामार्गानंतर आता समृद्धी महामार्गाच्या विस्तारालाही शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे. नांदेड तालुक्यातील समृद्धी महामार्गालगतच्या 12 गावांतील बाधित शेतकऱ्यांनी अतिरिक्त जमीन अधिग्रहणाला ठाम विरोध दर्शवला आहे. सरकारने यापूर्वी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा बाजारभावानुसार मोबदला अद्याप दिलेला नसल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी अधिग्रहणासाठी लावलेले खांब उखडून टाकले. "आमच्या शेतजमिनीवर पाय ठेवला, तर याद राखा," असा इशारा देत शेतकऱ्यांनी आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. आज बाबुळगाव फाटा येथे झालेल्या बैठकीत तुप्पा, काकांडी, बाबुळगाव, गुंडेगाव, पांगरी, विष्णुपुरी आदी गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बैठकीत सर्व्हिस रोड, इंटरचेंज आणि इतर कामांसाठी करण्यात येणाऱ्या अतिरिक्त जमीन संपादनास विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन छेडण्याचेही ठरवण्यात आलं.</p>
