<p> बीड- आषाढी पालखी सोहळ्यानिमित्त संपूर्ण राज्यात विठुरायाचा गजर घुमत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात शके 1828 मध्ये खरेदी केलेल्या तांब्या पितळी भांड्यांत आजही महाप्रसाद शिजतो. बीडकरांनी अनेक वर्षांची परंपरा जपली आहे. आषाढी वारीसाठी बीडमध्ये दाखल झालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या स्वागताला यंदाही अनेक वर्षांची परंपरा साक्षीदार ठरली. निजामकालीन आणि स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली ही सेवा आज पाचवी पिढी त्याच भक्तिभावानं जपत आहे. विशेष म्हणजे, शके 1828 मध्ये खरेदी करण्यात आलेली ऐतिहासिक तांब्याची आणि पितळी भांडी आजही जतन करण्यात आली आहेत. याच भांड्यांमध्ये वारकऱ्यांसाठी वरण-भात आणि चपातीचा महाप्रसाद शिजवला जातो. पंचाचा वाडा, लोकवर्गणी आणि सेवाभाव यांच्या बळावर सुरू असलेली ही परंपरा म्हणजे मुक्ताईच्या पालखीप्रती बीडकरांची अनोखी आणि अविस्मरणीय सेवा आहे.</p>
