<p>पुणे : पुण्यात आयएएस अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘तुकाराम’ (Tukaram) या पुस्तकाचं प्रकाशन मोठ्या उत्साहात झालं. टिळक स्मारक मंदिर येथे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. लेखक शफी पठाण यांनी हे पुस्तक लिहिलं असून प्रकाशनापूर्वीच एक लाखांहून अधिक प्रतींचं आगाऊ बुकिंग झालं आहे. यावेळी तुकाराम मुंढे म्हणाले की, "स्पर्धा परीक्षेतील यश किंवा अपयश हे अंतिम नसतं. स्पर्धा परीक्षा किंवा पद हे केवळ एक माध्यम आहे. जी व्यक्ती स्पर्धा परीक्षेची प्रामाणिकपणे तयारी करते, ती आयुष्यात कधीच अपयशी होत नाही. स्पर्धा ही कधीही दुसऱ्याशी करायची नसते, तर ती स्वतःच्या अंतर्गत क्षमतेशी करायची असते. स्वतःशीच स्पर्धा करून उद्या स्वतःपेक्षा एक अधिक चांगला माणूस बनणं हाच या तयारीचा खरा हेतू असतो. या प्रवासातून शिकून आपण एक चांगला माणूस आणि समाजाचा सुजाण घटक बनलो, तर समाज अधिक उंचीवर जाण्यास वेळ लागणार नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात जा पण तिथे तुमचं सर्वोत्तम काम करा. जेव्हा मी सर्वोत्तम कामाबद्दल बोलतो तेव्हा माझ्या दृष्टीनं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'नैतिकता' होय. जर आपल्या वागण्यात आणि आचरणात नैतिकता नसेल, तर आपण आतून पोकळ असतो. हा आतला पोकळपणा थांबवून, समाजात जे जे चांगलं घडत आहे, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुढं गेलं पाहिजे"</p>
